तुमचा मुलगा काय वाचतो


 

तुमचा मुलगा काय वाचतो

वाचाल तर वाचाल, हे गुळगळीत झालेले सुभाषित, किती महत्वाचे आहे, हे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या निमित्त त्यांच्याशी संवाद करताना, ही बाब ठसठशितपणे दिसून आली. मुद्रित‍ शब्दांपेक्षा किंवा माध्यमांपेक्षा डिजिटल माध्यमांकडे या मुलामुलींचा कल अधिक कल किंवा पूर्णच कल असल्याचे ,सध्याचे चित्र आहे. सतत हातातीन स्मार्ट फोनमध्ये घुसलेली ही मुले मग नेमके काय वाचतात किंवा बघतात? याकडे पालकांचे आणि शिक्षकांचे तरी लक्ष आहे का? हा कळीचा प्रश्न आहे.

अनास्था

१२ वीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन युनिर्व्हसिटी एक्झामिनेशन - अंडर ग्रॅज्युएट परीक्षेविषयी मुंबईच्या पालक आणि शिक्षकांसोबतच दापोली सारख्या गावात सुध्दा असेच चित्र दिसून आले. अग्निवीर नेव्हीसाठी अर्ज करण्याची प्रवेश प्रकिया सध्या सुरु असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती हे सुध्दा विद्यार्थ्यांना ठाऊक नसल्याचे दिसून आले.

वाचनाबद्दलची अनास्था आणि अनुत्साह फार काळजीचा आहे. नागरी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांच्या मुलाखती वाचन्याचे कष्टही मुलांनी घेतलेले नाहीत. या मुलाखतीमध्ये ही यशस्वी मंडळी आपल्या यशाची काही सूत्रे आणि तंत्रं याविषयी विस्ताराने सांगतात. जर मुलांच्या नजरेखालून हे गेलेच नाही तर त्यांना प्रेरणा आणि मार्ग कसा मिळणार?

नागरी  सेवा परीक्षेमधील प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत जनरल स्टडीज किंवा सामान्य अध्ययनावर बरेच प्रश्न विचारले जातात. त्याचा अभ्यास ही यशस्वी मुलं इंडिया इअर बूक किंवा भारत वार्षिकी मधून करतात. सामान्य अध्ययनाच्या अचुक आणि वस्तुनिष्ट अभ्यासासाठी हे पुस्तक महत्वाचे ठरते. कोचिंग क्लासेसची संचालक मंडळी याच पुस्तकांचा आधार घेऊन स्वत:ची पुस्तकं काढतात किंवा नोटस विद्यार्थ्यांच्या माथी मारतात. या पुस्तक किंवा नोटस्मध्ये छपाई करताना चुका होऊ शकतात. त्यामुळे‍ मुलांनी इंडिया इअर  बूकच वाचायला हवे. गेल्या कित्येक दशकांपासून हे पुस्तक भारत सरकारच्या प्रकाशन शाखेमार्फत प्रकाशित केले जाते. पण त्याविषयी मुलं ,पालक आणि शिक्षक (अपवाद वगळता) पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. एका महाविद्यालयातील वरिष्ट श्रेणिच्या प्राध्यपकांनासुध्दा याबद्दल माहिती नव्हती. त्यानांच माहिती नव्हती, तर ते विद्यार्थ्याना काय मार्गदर्शन करणार?

कुरुक्षेत्र आणि योजना

नागरी सेवा परीक्षेत यशस्वी झालेली मुलं, केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागामार्फत प्रकाशित कुरुक्षेत्र, प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित योजना मासिक नियमितपणे वाचतात. या मासिकांमध्ये भारत सरकारचे निर्णय, धोरण आणि योजना याविषियी अचुक आकडेवारी तर असतेच शिवाय देशातील नामवंत तज्ज्ञ मंडळी त्यावर सखोल विश्लेषणही करतात. या योजनांची फलनिष्पत्ती काय, त्यामुळे लोकांच्या जीवनात कोणते बदल घडून आले किंवा येतातहेत याविषयीचे अभ्यासूपर्ण विवेचन असते. वेगवेगळया समस्यांच्या निराकरणासाठी जागतिक स्तरावर होत असलेले प्रयत्न, त्याअनुषंगाने भारत सरकारने घेतलेला पुढाकार याविषयी या मासिकांमध्ये तज्ज्ञांमार्फत आढावा घेतला जातो. या मासिकांच्या नियमित वाचनाने विदयार्थ्यांना नवी दृष्टी आणि दृष्टिकोन प्राप्त होतो. त्याचा उपयोग उत्तरं लिहिताना होतो. विद्यार्थी हा अत्यंत जागरुक असल्याचे परिक्षकांच्या लक्षात येते. त्याला इतरांपेक्षा अधिक गुण ‍मिळू शकतात. कोचिंग क्लासवाल्यांच्या एकसारख्या नोट्समुळे, विद्यार्थ्यांच्या उत्तरातही तोच तोचपणा येतो. या विद्यार्थ्यांनी एकसारख्याच नोट्स वाचल्याचे परीक्षकांच्या लक्षात येते. त्याचा परिणाम अर्थातच कमी गुण मिळण्यावर येतो. या मासिकांचे इतके महत्व असूनही आपली बहुसंख्य मराठी मुलं या दोन्ही मासिकांबाबत अनभिज्ञ आहेत. हे तसे धक्कादायकच आहे. कुणीतरी त्यांना सातत्याने या मासिकांना वाचत चला, असे सांगितले पाहिजे. तसा प्रयत्न काही संस्थाचालक करतही असतील, पण त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात.

रोजगार समाचारचे महत्व

रोजगार समाचार किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज ही दोन साप्ताहिके भारत सरकारच्या प्रकाशन शाखेमार्फत दर शनिवारी प्रकाशित होतात. पुढच्या आठ दहा दिवसात सगळया देशात पोहचतात. यात केवळ नोकरीच्याच जाहिराती असतात,असा एक गैरसमज असल्याचे दिसून येते. याचा अर्थ मुलं किंवा शिक्षक मंडळी ही साप्ताहिके काळजीपूर्वक बघत नाही, हे स्पष्ट आहे. वाचने तर दूरच राहिले. या साप्ताहिकांमध्ये देशातील सर्व राष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या प्रवेश सूचना ठळकरित्या प्रकाशित होतात. विद्यार्थी आणि पालकांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना वेळेवर या प्रवेश प्रकियेची माहिती होत नाही. त्यामुळे वेळेवर अर्जच भरला जात नाही. त्यामुळे पुढचे नुकसान हे अपरिमित ठरते.

या दोन्‍ही साप्ताहिंकांमध्ये वेगवेगळ्या करिअर पर्यायांची माहिती, भारत सरकारच्या योजना, निर्णय धोरणे यांची माहिती, आठवड्याभरातील महत्वाच्या घटनांच्या दिनांकनिहाय नोंदी, असे सारे काही असते. ही साप्हिके वाचत नसल्याने विद्यार्थ्यांना चाचपडत राहावे लागते. मग ते त्यांना ठेचा लागत राहतात.

वेळ न मिळणे- एक विनोद

वेळ मिळत नाही असे सांगणे हा एक विनोदी प्रकारच आहे.आपल्या हितासाठी जर वाचायला वेळ मिळत नसेल मग कशासाठी वेळ मिळतो? हा प्रश्नच आहे. कोचिंग क्लासमधील कितीही दर्जेदार चोपड्या वाचल्या किंवा त्याची पारायणे केली तरी जोपर्यंत मूळ साहित्य वाचले जात नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास परिपूर्ण होत नाही. मग तुम्ही सलग तीन चार वर्षे पंधरा पंधरा तास अभ्यास करा किंवा चोपड्यांचे पाठांतर करा, अपयश येणार हे नक्की.

आमचा मुलगा पेपर वाचत नाही किंवा आज कोण पेपर वाचतो, असे कौतुकाने सांगणारे बरेच पालक आहेत. हे आणखीनच भयावह आहे. पालकांनाच जर वाचण्याची आणि अधिक प्रभल्ग होण्याची कवडीची इच्छा नसेल तर मुलांच्या बाबतीत आनंदी आनंद राहील.

डिजिटल भूलभुलैय्या

डिजिटल माध्यमांमध्ये केवळ यूट्यबरील व्हीडिओ बघून किंवा रिल्स बघून ज्ञानार्जन अजिबात होत नाही. या बाबी रंजनाच्या आहे. सतत रंजन करत‍ राहाणार आहोत का? हा प्रश्न पालकांनी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी स्वत:लाच विचारायला हवा. डिजिटल माध्यमांमध्ये भरपूर ज्ञानवर्धक गोष्टीही येतात. ते वाचलं जातं का? त्‍याचं उत्तर नाहीच असं येतं. इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्तामधील लेख, या दोन्ही दैनिकांच्या डिजिटल आवृत्यांमध्ये येतात. पण मोबाईलवर हे लेख वाचणे, त्याच्या नोंदी करणे, नोट्स काढणे हे जिकरीचे आहे. जी मुलं असा प्रयत्न करतील त्यांचे कौतुक आहे. पण इतरांचे काय? ही संख्या प्रचंड आहे.

व्यक्तिमत्व विकासाला बाधा

मुलं वाचतच नसल्याने आणि पालक आणि गुरुजन त्यांना प्रोत्साहन देत नसल्याने, मुलांचा चौफेर व्यक्तिमत्व विकास होत नाही. त्यांचे भाषा कौशल्य वाढत नाही, शब्दसंग्रह वाढत नाही, वेगळा विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होत नाही. सध्याच्या काळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सॉफ्ट स्किलपासून हा विद्यार्थी वंचित राहतो. अर्थातच त्याला चांगल्या करिअरसंधी मिळणे अशक्य होते. अशा संधी मिळाल्या तरी, तो सध्याच्या स्पर्धेत टिकून राहू शकत नाही. चौफेर व्यक्तिमत्व विकास हा वाचनामुळेच शक्य आहे. ही बाब विद्यार्थी ,पालक आणि‍ शिक्षक यांच्या लवकरात लवकर लक्षात येईल, तो दिन सुदिन समजायचा !

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी