अनास्था आणि निरुत्साह



 अनास्था आणि निरुत्साह

कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (अंडरग्रज्युएट)-सीयूइटी-यूजी
यंदा म्हणजेच २०२३ साली कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (अंडरग्रज्युएट)-सीयूइटी-यूजी या परीक्षेसाठी देशभरातून १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ६.५१ लाख विद्यार्थीनींचा समावेश आहे. या परीक्षेव्दारे देशातील २४२ संस्थांमध्ये पदवीस्तरीय अभ्याससक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. यामध्ये सर्व केंद्रिय विद्यापीठे, राज्यातील विद्यापीठे आणि इच्छूक खाजगी शैक्षणिक संस्था आणि स्वायत्त संस्थांचा समावेश आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही संख्या ९० ने अधिक आहे. ही परीक्षा १३ भाषांमध्ये घेतली जाते.
दिल्ली युनिव्हर्सिटीतील ७३ अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक २८ लाख अर्ज करण्यात आले. सरासरीने हा आकडा प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ३८ हजार असा निघतो. बनारस हिंदू विद्यापीठातील २३ अभ्यासक्रमांसाठी साडे आठ लाख अर्जांची नोंदणी झाली आहे. या परीक्षेव्दारे प्रत्येक विद्यार्थी कमाल १० पदवीस्तरीय विषयांसाठी अर्ज करु शकतो आणि त्याला बहुवीध संस्था आणि अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करता येणे शक्य आहे. या परीक्षेतील सर्वसाधारण चाचणी (जनरल टेस्ट) च्या पेपरसाठी सर्वाधिक ८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यानंतर भौतिकशास्त्रासाठी ६.५ लाख आणि रसायनशास्त्र विषयासाठी ६.३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गणितासाठी ४.८ लाख जीवशास्त्रासाठी ४ लाख, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रासाठी प्रत्येकी दोन लाख, इतिहासासाठी १.८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. बिझिनेस स्टडीज या विषयासाठी २ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दिल्ली युनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदु युनिव्हर्सिटीनंतर अर्जांची सर्वाधिक नोंदणी झालेल्या विद्यापीठांमध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ लखनौ (४.१ लाख), अलाहाबाद विद्यापीठ लखनौ (३.१ लाख), जामिया मिलिया विद्यापीठ (२.६ लाख), यांचा क्रमांक लागतो. यंदा युरोप, आशिया, अमेरिका, आखातातील ७४ देशातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली.
या परीक्षेमध्ये ३३ भाषांचा समावेश आहे. सर्वाधिक इंग्रजी भाषेसाठी म्हणजे ९.७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यानंतर हिंदी भाषेसाठी २.६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. उर्दूसाठी १२ हजार आठशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
००००
आपली अनास्था
उपरोक्त नमूद आकडेवारी विस्तृतपणे देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा या परीक्षेसंदर्भातील निरुत्साह. गेल्या वर्षीपेक्षा यंदा ही संख्या वाढली असली तर, ती निश्चितच समाधानकारक नाही. आपले पालक, शिक्षक/ अध्यापक/ शिकवणी-सर, शैक्षणिक संस्था या परीक्षेसंदर्भात अजुनही फार जागरुक नाहीत, असे खेदाने म्हणावे लागते. काही प्राध्यापकांशी चर्चा केली असता, त्यांना सीयूईटी-यूजीबद्दल जुजबीही माहिती नसल्याचे दिसून आले. नीट आणि जेईई परीक्षेबाबत (महा)जागरुक असणाऱ्या महाराष्ट्रीय पालकांच्या ध्यानीमनीही ही परीक्षा नसते.
१२ वी नंतर काय? च्या रोडमॅपमध्ये या परीक्षेचा फार अल्प प्रमाणात पालक समावेश करतात. या परीक्षेविषयीची ही अनास्था अनाकलनीय आहे. एकिकडे, पुढे काय? पुढे काय? चा धोशा लावायचा आणि दुसरीकडे उत्तम शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देणाऱ्या मार्गाविषयी अनभिज्ञ असायचे, यास काय म्हणणार ? शैक्षणिकदृष्ट्या मागास मागास म्हणून सतत हिणवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून या परीक्षेसाठी आपल्या राज्यापेक्षा अधिक नोंदणी होते. याचा अर्थ तेथील विद्यार्थी आणि शिक्षक हे अधिक जागरुक आहेत असाच घ्यायला हवा.
ही परीक्षा २१ मे ते ३१ मे २०२३ या कालावधीत होणार असली तरी या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ फेब्रुवारी २०२३ ला सुरु होऊन १२ मार्च २०२३ ला संपली. याचा अर्थ ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी उपरोक्त नमूद कालावधीत अर्ज भरला असेल त्यांनाच ही परीक्षा देता येईल. बाकी सर्वांची संधी यंदा हुकेल.
सीयूईटी-यूजी ही परीक्षा दरवर्षीच होत असते. साधारणत: त्याच्या प्रवेशप्रक्रियेचा कालावधीही ठरलेला असतो. त्याविषयी सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून ठळकपणे जाहिरातीव्दारे लोकांना माहिती दिली जाते. ही बाब लक्षात घेऊन यंदा १२वीत असणाऱ्या मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी २०२४ च्या सीयूईटी(यूजी) परीक्षेची नोंद आपल्या मनात आणि घरातील कॅलेंडरमध्ये करुन ठेवावी व योग्य वेळी अर्ज प्रकियेत सहभागी व्हावे.
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
या परीक्षेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे असल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वस्तुनिष्ठ पध्दतीने केले जाते. या परीक्षेतील मूल्यांकन हे तंत्राधिष्ठित असल्याने मानवी हस्तक्षेपास वाव नसतो. परीक्षा १२ वी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र असा अभ्यास करावा लागणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी १२ वीचा अभ्यास योग्य पध्दतीने करतील त्यांना ही परीक्षा कठीण जाणार नाही. विद्यार्थ्यांना २७ विषय, ३३ भाषा आणि सामान्य क्षमता चाचणीच्या निवडीचे पर्याय असतील. त्यामुळे विद्यापीठांच्या गरजेनुसार प्रत्येक विद्यार्थी त्याचा विषय/भाषा आणि सामान्य चाचणीची निवड करु शकतो. ही परीक्षा संबंधित विद्यार्थी त्याच्या आवडीच्या किंवा गती असलेल्या १३ पैकी कोणत्याही एका भाषेतून देऊ शकतो.
या सामायिक परीक्षेमुळे १२ वी बोर्डाच्या परीक्षेचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कारण प्रत्येक विद्यापीठात वेगवेगळया अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वाचा घटक १२ वीच राहणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजंसी मार्फत ही परीक्षा उच्च दर्जाची राहील याची खात्री केली जाते. या परीक्षेव्दारे सामायिक कल चाचणीसोबत विज्ञान, मानव्यशास्त्र, भाषा, कला आणि व्यावसायिक विषयात परीक्षा देणे शक्य आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पानत्मक ज्ञानाची तपासणी आणि प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता या परीक्षेव्दारे तपासली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनावश्यकरीत्या शिकवणी वर्गांची मदत घ्यावी लागणार नाही. चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याचा आवडीचा विषय घेणे सुलभ होईल. प्रत्येक विद्यापीठास विद्यार्थाची कामगिरी वस्तुनिष्ठरीत्या तपासणे शक्य होईल.
परीक्षेचे स्वरुप
केंद्रिय विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी सामायिक परीक्षा पुढीलप्रमाणे असेल.
भाग एक अ - भाषा- एकूण १३ भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. यापैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्यास निवडता येईल. एकूण ५० प्रश्नांपैकी ४० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील. हे प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पध्दतीचे (मल्टिपल चॉईल ऑब्जेक्टिव्ह) असतील. विद्यार्थ्यांचे भाषिक ज्ञान तपासण्यासाठी या प्रश्नांची रचना असेल. यासाठी वेगवेगळ्या पध्दतीचे उतारे दिले जातील. कालावधी ४५ मिनिटे. ग एक अ मधील भाषा- इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगु, आणि उर्दू.
भाग एक ब- भाषा- एकूण २० भाषांमध्ये प्रश्न विचारले जातील. पहिल्या भागातील १३ भाषा वगळून या २० पैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थ्यास निवडता येईल. या विभागातही भाग एक अ प्रमाणेच प्रश्नांची रचना राहील. कालावधी ४५ मिनिटे.
भाग एक (ब) मधील भाषा-अरेबिक, बोडो, चायनिज, डोग्री, फ्रेंच, जर्मन ,इटालियन, जॅपनिज, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मनिपुरी, नेपाली, रशियन, संथाली, सिंधी, स्पॅनिश, संस्कृत, तिबेटी
भाग दोन (विषय निहाय)- यामध्ये एकूण २७ विषयांवर प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांने अर्ज केलेल्या विद्यपीठातील प्रवेशासाठी आवश्यक असलेला कोणताही विषय विद्यार्थी निवडू शकतो. कालावधी - ४५ मिनिटे. प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतील. ४५/५० पैकी ३५/४० प्रश्न सोडवावे लागतील जातील.
भाग तीन- सामान्य चाचणी (जनरल टेस्ट) - (ज्या विद्यापीठांमध्ये पदवीस्तरीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केवळ सामान्य चाचणीचे गुण ग्राह्य धरले जातील,त्यांच्यासाठी.) ६० पैकी ५० प्रश्न सोडवावे लागतील. कालावधी- ६० मिनिटे. प्रश्न बहुपर्यायी आणि वस्तुनिष्ठ पध्दतीचे असतील. यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सामान्य बौध्दिक क्षमता, संख्यात्मक क्षमता, तार्किक क्षमता (सर्व सामान्य गणिताची सूत्रे, संकल्पना आदींवर हे प्रश्न विचारले जातील.) विश्लेषणात्मक क्षमता.
ही परीक्षा संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असेल. ही परीक्षा झाल्यावर तीन दिवसात cuet.samarth.ac.in या संकेतस्थळावर उत्तर पत्रिका प्रकाशित करण्यात येते. त्याची जाहीर सूचना वृत्तपत्रे/ इतर माध्यमे यामध्ये प्रकाशित करण्यात येते. या उत्तरांशी सुसंगत उत्तरे नसल्यास, संबंधित विद्यार्थी आपली तक्रार नोंदवू शकतो. तथापि त्यासाठी विद्यार्थास शुल्क भरावे लागेल. ही उत्तर पत्रिका दोन ते तीन दिवस संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
सुरेश वांदिले
May be an image of 1 person

Comments

Popular posts from this blog

वेगळे पर्याय

अग्निपथ : उत्तम आणि उत्कृष्ट

कंपनी सेक्रेटरी