संधी असल्या तरी भाग तीन पर्यटन आणि आतिथ्यशीलता


 

संधी असल्या तरी भाग तीन

पर्यटन आणि आतिथ्यशीलता

दोन वर्षापासून पर्यटन व्यवसायाला मंदी आली होती. मात्र गेल्या वर्षीपासून या व्यवसायाला नवी झळाळी मिळाली .गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात काश्मिरमध्ये ८० लाख पर्यटक गेले. गेल्या ५० वर्षात इतके पर्यटक गेले नव्हते. यंदाही तशीच स्थिती आहे. वाढलेल्या पर्यटकांची ही संख्या या क्षेत्रात अधिकाधिक मनुष्‍यबळ लागणार असल्याचे स्पष्ट करते. यंदासुध्दा अनेक मोठ्या पर्यटन कंपन्यांनी मोठी भरती केली. यापुढील काळात याक्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्‍यबळ लागणार असल्याचे लक्षात घेऊन इंडियन  इंस्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या संस्थेने, बॅचलर ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम या अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून तो कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याला करता येतो.

पर्यटन व्‍यवसाय वाढला की आतिथ्यशीलता म्‍हणजेच हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल व्यवसायातही वाढ होते. आपल्या राज्यात या विषयाचे शिक्षण देणाऱ्या ब-याच खाजगी संस्था आहेत. त्यांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबात प्रश्नचिन्हच आहेत. मात्र भारत सरकारने देशात २२ ठिकाणी इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटेरिंग टेक्नॉलॉजी ॲण्ड ॲप्लाईड न्युट्र्रिशन, या संस्थेची स्थापना केली आहे. त्यापैकी एक संस्था दादरला चैत्यभूमिच्या जवळ आहे. ही संस्था देशाती सर्वोच्च पाच मध्ये येते. या संस्थेत‍ बी.एस्सी इन हॉस्पिटॅलीटी ॲण्ड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम करता येतो. हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याची इच्‍छा असल्यास  आणखी एक वर्ष शिकून अधिक प्रगत ज्ञान मिळवू शकतो. या अभ्यासक्रमाच्या नावात बी.एसस्सी असले  तरी तो कोणत्याही शाखेतून १२ वी झालेल्या विद्यार्थ्याला करता येतो. त्यासाठी जाईंट एंट्रन्स टेस्ट (जेइइ) घेतली जाते. देशातील २२ संस्थामध्ये १० हजाराच्या आसपास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आतपार्यंत १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना उत्तम अशा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत.

स्मार्ट व्यवस्थापक

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमच्या, इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रमाबद्दलही मराठी  आणि पालक फार जागरुक नाहीत असे दिसून येते. असा काही अभ्यासक्रम आहे, हेच बऱ्याच जणांना ठाऊक नाही.

आयआयएम ही आपल्या देशातील व्यवस्थापन विषयाचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था आहे. या संस्थेच्या इंदौर, रांची, रोहतक, बोधगया आणि जम्मू या कॅम्पसमध्ये १२ वी नंतरचा हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आ आहे. समजा १२ वीनंतर‍ विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेईल, तेव्हा त्‍याचे वय १७ किंवा १८ वर्षाचे असेल,आणि जेव्हा तो हा अभ्यासक्रम पूर्ण करेल तेव्हा त्याचे वय २३ वर्षाचे असेल. याचा अर्थ असा की वयाच्या २३ व्या वर्षी  एक‍ उत्तम पदवी आणि १२ लाख ते १५ (किंवा यापेक्षा अधिक) लाखापर्यंतच्या वार्षिक वेतन (पॅकेज) असलेली, चांगली नोकरी हातात असेल. अशी ही लाखांची नोकरी कुणाला नको असते? मग त्यासाठी हा अभ्यासक्रम करायला हवा ना! हा अभ्यासक्रम कोणत्याही १२ वी शाखेतील विद्यार्थ्याला करता येतो. दुर्देव्याने या अभ्यासक्रमाला सुध्दा अल्पसंख्येने मराठी मुल निवडले जात असल्याचे दिसून आले आहे. 

कुणालाही आयआयटीत प्रवेश

आयआयटी म्हणजे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेशासाठी जॉईंट एन्ट्रस एक्झामिनेशन, मेन आणि ॲडव्हान्स्ड परीक्षा द्यावी लागते. या जेइइ परीक्षेला १० लाखाच्या आसपास विद्यार्थी बसतात. त्यातून १६ हजार विद्यार्थ्यांची निवड होते. मात्र आयआयटी मुंबई आणि आयआयटी मद्रास या दोन आयआयटीमध्ये जेइइ परीक्षेशिवाय प्रवेश मिळू शकतो. तोसुध्दा कोणत्याही १२वी शाखेतील विद्यार्थ्याला.

आयआयटी मुंबईच्या अंतर्गत इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर-स्कूल ऑफ डिझाइन नावाची संस्था कार्यरत आहे. या संस्‍थेने, बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमला कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेपैकी कोणत्याही एका शाखेत अभ्‍यास केलेल्या १२ वीच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. प्रवेशासाठी या संस्थेमार्फत वेगळी परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षीपासून या परीक्षेचे गुण आयआयटी दिल्ली आणि आयआयटी हैदराबाद येथील डिझाइन पदवी अभ्यासक्रमासाठी स्वीकारले जातात.

आयआयटी मद्रासने सुरु केलेले, इंटिग्रेटेड एम इन डेव्हलपमेंट स्टडीज आणि इंटिग्रेटेड एम ए इन इंग्लिश हे दोन अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतून १२ वी केलेल्या विद्यार्थ्याला करता येतात. प्रवेशासाठी आयआयटी मद्रास मार्फत स्वतंत्र परीक्षा घेतली‍ जाते. या दोन्ही अभसक्रमाला कोणत्याही शाखेतून १२  वी केलेल्या विद्यार्थ्यास मिळू शकतो. हे अभ्यासक्रम केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तमतोत्तम करिअरच्या संधी मिळत असतात. आयएएस ,आयपीएस यासारख्या परीक्षांसाठी जी सिव्हिल सर्व्हिस/नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. त्याची बरीचशी तयारी हा अभ्यासक्रम‍ करताना होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सागरी वाहतूक

भारतात आणि जगात सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीचा समावेश आहे. या वाहतुकीसाठी मोठ मोठी जहाजे लागतात. त्यांचे निंयत्रण, व्यवस्थापन, बांधणी, देखभाल, दुरुस्ती, वाहतूक या साऱ्यांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. त्याअनुषंगाने भारत सरकारने इंडियन मेरिटाइम युनिर्व्हसिटिची स्थापना केली. या संस्थेचे एक कॅम्पस मुंबईत आहे. या संस्थेत, बीटेक मरीन इंजिनीअरिंग, बीएस्सी नॉटिकल सायंस, बी.टेक नॅव्हल आर्किटेक्चर ॲण्ड ओशन इंजिनीअरिंग, बी.एस्सी- शिप बिल्डिंग, बीबीए मेरिटाइम लॉजिस्टिक्स, हे अभ्यासक्रम करता येतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.      

अनास्था आणि अनुत्साह

अशा प्रकारे शंभर टक्के करिअर घडविण्याची क्षमता असणाऱ्या या अभ्यासक्रमांना फार कमी मराठी मुलं प्रवेश‍ घेतात. हे सर्व अभ्यासक्रम भारत सरकारच्या अत्यंत दर्जेदार संस्थांमध्ये शिकवले जातात. येथे उच्च प्रशिक्षित प्राध्यापक आहेत, अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत, उत्तम गंथालये आहेत, मुला-मुलींना राहण्यासाठी स्वतंत्र वसतीगृहे आहेत, या संस्थांची फी अल्प असते. एखाद्या संस्थेची फी जास्त असली तर या संस्था बँकाकडून कर्ज मिळवून देण्यासाठी साहाय्य करतात. बँकासुध्दा या संस्थांचा दर्जा लक्षात घेऊन तत्काळ कर्ज मंजूर करतात. या संस्थांना, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्पॉर्टन्सचा म्हणजेच, महत्वाच्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा भारत सरकारने दिला आहे. त्यामुळे या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार आणि‍ राज्य सरकार शिष्यवृत्ती देते.

सगळयात महत्वाचे म्हणजे या सर्व संस्थांमध्ये प्लेसमेंट सेल आहेत. याचाअर्थ तुम्ही जेव्हा पदवीच्या अंतिम वर्षाला असता तेव्हा शेवटच्या सत्रामध्ये प्लेसमेंटसाठी मोठमोठ्या कंपन्या येतात आणि बहुतेक सर्वांना चांगल्या वेतनाच्या नोकरी मिळतात. तरी सुध्दा या संस्थामधे मराठी मुलं हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच जातात. याचे महत्वाचे कारण म्हणजे, आपली अनास्था!

आपल्याकडे केवळ मेडिकल, इंजिनीअरिंग किंवा फारतर सीएचा विचार होतो. त्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. इतर करिअर पर्यांयाकडे जरासुध्दा लक्ष पुरवले जात नाही. या राष्ट्रीय संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेकडे कुणाचे फारसे लक्ष जात नाही.या संस्थांची प्रवेश प्रकिया शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या सहा महिने आधीच सुरु होते. उदाहरणार्थ, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिझाइनच्या प्रवेश परीक्षेची सूचना दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित होते. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी‍ या संस्थेच्या प्रवेश‍ परीक्षेची जाहिरात नोव्हेंबर महिन्यात प्रकाशित होते. त्याकडे आपले लक्ष जात नाही. त्यामुळे वेळेवर अर्ज भरला जात नाहीत.अर्ज भरणार नाही तर परीक्षेला कसे बसणार? परीक्षा नाही म्हणजे प्रवेश नाही. असे हे दुष्ट चक्र आहे. 

प्रत्येकाच्या घरी एखादा महत्वाचा मराठी किंवा इंग्रजी पेपर घेतला जात असेल. त्यात या सर्व जाहिराती (ॲडमिशन नोटिसेस) येतात. भारत सरकारच्या प्रकाशन शाखेमार्फत प्रकाशित एम्ल्पॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचार या साप्‍ताहिकांमध्ये या जाहिराती ठळकरित्या दिल्या जातात. दररोजच्या पेपरमधील प्रत्येक पानावरील शीर्षक जरी तुम्ही वाचले तरी तुमच्या हिताच्या कोणत्या गोष्टी आहेत ते लक्षात येऊ शकते. यासाठी फार तर दहा-बारा मिनिटे लागतील. तेवढाही करिअर वेळ नाही असे वाटत असेल तर तुम्ही‍ स्वत:हून अनेक करिअर संधी गमावता हे लक्षात ठेवा.

१२ वी नंतरचा तीन-चार वर्षाचा काळ महत्वाचा असतो. याकाळात अधिकाधिक ज्ञानार्जन केले पाहिजे आणि या ज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याकडे लक्ष पुरवले पाहिजे. आजच्या काळात तुम्ही कोणत्या संस्थेतून पदवी घेता हे जितके महत्वाचे तितके किंवा त्याहून अधिक महत्वाचे तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा वापर कसा प्रभावीपणे करता (ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज) हे महत्वाचे. ते जर शक्य झाले नाही तर तुम्हाला संधी मिळणार नाही. मिळाली तरी तुम्ही प्रगती करु शकणार नाही. त्यामुळे या काळात टाइमपास केल्यास हाच "टाइम‍" तुम्हाला "आऊट" करुन टाकेल, हे सत्य कायम लक्षात राहू द्या.

प्रत्येकाकडे एक वैशिष्टपूर्ण गुण असतो, कला असते. त्याची जाणीव व्हायला हवी. ती झाली आणि कौशल्यआधारित अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवला तर‍ प्रत्येकालाच नक्कीच यश मिळू शकते.

सुरेश वांदिले

 

 

Comments